चूलबंद परिसरात मोकळ्या जागेत अवैध रेती साठवणूक
रेतीघाट बंदीचा आदेश धाब्यावर
दै. लोकजन वृत्तसेवा
पालांदूर :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १० जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व रेती घाट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र लाखनी तालुक्यात या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुकाभर विशेषतः चूलबंद परिसरात अनेक ठिकाणी अवैध रेती साठवणूक वाढल्याने नदीकाठच्या गावांमध्ये रेतीचे मोठेमोठे ढिगारे उभे राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे व ही वस्तुस्थिती आहे.
बांधकाम क्षेत्रातील रेतीची मागणी कायम असल्याने अनेक ठिकाणी नदीपात्रातून अवैध रित्या रेती उपसा करून तिची साठवणूक केली गेली असल्याचे वासतव आहे. गावातील मोकळा जागा, रस्त्याच्या कडेला तसेच शेत परिसरार मोठ्या प्रमाणावर रेतीचे ढिगारे आढळून येत आहेत. या साठवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून पावसाळ्यात ही रेती उभ्या रस्त्यावर पसरल्याने अपघाताचा धोका वाढरत असल्याचे अनेक नागरिकांची तक्रार आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, रेती घाट बंद असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती साठवणूक कशी काय होत आहे. याबाबत प्रशासनाने सूक्ष्म व सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
रेतीचे ढिगारे नेमके कोणाचे
लाखनी तालुक्याच्या चूलबंद परिसरातील नदी तीरावर, अनेक गावांमध्ये सार्वजनिक जागा, रस्तyakडेला आणि शेट परिसरात मोठ्या प्रमाणावर रेतीचे ढिगारे दिसून येत आहेत. या साठ्यांची माहिती स्थानिक प्रशासनाकडे आहे का? तसेच ते वैध आहेत की अवैध? याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे या सर्व रेती साठ्यांची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी जोर धरत आहे.
तसेच या रेती साठ्याची मालकी, परवानगी आणि वैधता तपासण्याची मागणीही होत आहे. दुसरीकडे, अवैध रेती उपशामुळे नदीपात्राच्या रचेनेवर परिणाम होण्याचा तसेच पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जड वाहनाच्या सततच्या वाहतुकीमुळे ग्रामीण रस्ते, पूल आणि नदीकाठच्या पायाभूत सुविधानाही धोका निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर स्वतः जिल्हाधिकारी यांनी कठोर पावले उचलून स्थानिक महसूल विभाग, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी सयुक्त कारवाई करून अवैध रेती साठवणूक व वाहतुकीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांडून केली जात आहे.








