जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर -जिल्हाधिकारी संजय कोलते

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्याचा विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जनकल्याण यात्रा २०२५ चे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम मोबाईल एलईडी व्हॅनमार्फत राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे. या जनकल्याण यात्रेचा भंडारा जिल्ह्यातील शुभारंभ आज सकाळी जिल्हाधिकारी परिसर कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रेरणेतून राज्यभर या योजनेचा जागर होण्यासाठी ही जन कल्याण यात्रा जिल्ह्यात प्रचार प्रसिद्धी करणार आहे. जनकल्याण यात्रेचे राज्यभर कार्यक्रम होत असून भंडारा जिल्ह्यामध्ये आता जनकल्याण यात्रा पोहोचली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात्रेचे स्वागत जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी केले.

विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. विशेष सहाय्यक विभागाच्या योजनांवर आधारित दिग्दर्शक व निर्माता शंकर बारवे यांनी तयार केलेला माहितीपट मोबाईल एलईडी व्हॅन द्वारे दाखविण्यात आला. त्याचबरोबर योजनेची माहितीपत्रके लाभार्थ्यांना देऊन योजनेची माहिती देण्यात आली. विशेष सहाय्य विभागाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना या सहा मुख्य योजना राज्य शासन व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत.

लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टल द्वारे लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक असून सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन लघुपटामध्ये केलेल्या केलेल्या आवाहनाच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. ही यात्रा एकूण पंधरा दिवस सुरू राहणार आहे. जनकल्याण यात्रेकरता एलईडी व्हॅन द्वारे दाखवण्यात येणाऱ्या माहितीपटाची निर्मिती व दिग्दर्शन शंकर बारवे यांनी केले असून सदर माहितीपट मोबाईल एलईडी व्हॅन द्वारे राज्यातील विविध गावात व शहरात दाखविण्यात येऊन जनजागृती करण्यात येत आहे. त्याद्वारे लाभार्थ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहचविण्यात येणार आहे.

या माहितीपटाद्वारे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले, आपले राज्य सरकार आणि केंद्र सरकार समाजातील गोरगरीब, वंचित, ज्येष्ठ, वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार या सर्वांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना राबवत आहे. या विविध योजना राबवताना संबंधित लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, त्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या हातात मिळावी, यासाठी डी. बी. टी. पोर्टल द्वारे त्यांना त्यांची विशेष सहाय्य मदत त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेतून भ्रष्टाचार, दिरंगाई थांबली आहे. समाजातील गरजू, निराधार, निराश्रीत आणि वृद्धांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच कटीबद्ध आहे आणि यापुढेही राहील. समाजातील सर्व गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना या विविध योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळावी, यासाठी विशेष सहाय्य विभाग कार्यरत असून सदर योजनेचा प्रसार राज्यभर करण्यात येत आहे तरी सर्व पात्र लाभार्थी यांनी योजनांचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *