ग्राम अदासीची ऐतिहासिक जित : बियरबारला जिल्हाधिकारी यांनी ठोकले कुलूप
गोंदिया:- दारू मुळे अख्खे आयुष्य उध्वस्त होते, मुलाबाळांची आबाळ होते. संसार बरबाद होते. गावचे गाव आणि तरुणाई रसातळाला लागते. हे सर्व हेरून अदासी गावचे काही नवयुवक समोर येतात आणि गावातील महिलांच्या एकजुटीने दारू बंदी बाबत पाऊल उचलतात आणि प्राणपणाने गाव वाचविण्यासाठी लढा देतात. कोर्ट कचेरी होते, भ्याड हल्ले होतात, मोर्चे निघतात, आरोप प्रत्यारोप होतात आणि सरते शेवटी सत्याची आणि चांगुलपणाची जित होते. २६ जानेवारी २०२५ रोजी ग्राम पंचायत अदासीच्या विशेष ग्राम सभेत गावातील अवैध दारू विक्री तसेच गावात सुरू असलेली बियर बार बंदी बाबत ठराव मंजूर करण्यात आला. आणि गावातील अवैध दारू विक्री १ फेब्रुवारी पासून बंद करण्यात आली.
१९ एप्रिल २५ रोजी महिलांची विशेष ग्राम सभा निवडणूक घेण्यात आली त्यात १२३२ महिला पैकी ७८८ महिलांनी आपली उपस्थिती लावली त्यात शून्य विरुद्ध ७८८ मतांनी ठराव मंजूर करण्यात आला.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी १९ मे २०२५ रोजी आपले समक्ष अंतिम सुनावणी लाऊन बियर बार बंदी बाबत शिक्का मोतर्ब केला आणि २३ मे रोजी आदेशावर स्वाक्षरी केली. आणि आज अदासीच्या ग्राम पंचायत प्रशासन व दारू बंदी समिती तसेच गावातील महिलांच्या एकतेला ऐतिहासिक जित मिळुन अविनाश उजवणे यांचेनावे असलेले मे. वाईन वल्ड बियर बार ॲन्ड रेस्टॉरंटला जिल्हाधिकारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताला ठोकला.