तिरोडा तालुक्यात हृदयद्रावक घटना; बोदलकसा जलाशयात नौका विहारादरम्यान दोन तरुणांचा बुडून मृत्यू, सात सुखरूप बचावले

दिलीप पारधी (संपादक)
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात मित्रांसोबत नौका विहारासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे बरबसपुरा गावावर शोककळा पसरली आहे. मृत तरुणांची नावे मोहित वसंत रहांगडाले व कुणाल शालिकराम भोंडे, दोघेही रा. बरबसपुरा, ता. तिरोडा अशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बरबसपुरा येथील नऊ तरुणांचा एक ग्रुप शनिवारी दुपारी बोदलकसा जलाशय परिसरात फिरण्यासाठी गेला होता. फिरत असताना त्यांनी जलाशयातील मच्छीमारांच्या डोंग्यातून नौका विहार करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अक्षय नरेंद्र बिसेन, राकेश राधेशाम लाडे, निखिल इंदल पटले, लक्की संजय रहांगडाले, प्रलय राधेशाम पारधी, मनीष रमेश कोकूडे, अविनाश श्रावण टेकाम, मोहित वसंत रहांगडाले आणि कुणाल शालिकराम भोंडे असे नऊ जण एकाच डोंग्यात बसले.
नौका विहार सुरू असताना अचानक डोंग्याचा तोल गेला आणि डोंगा पाण्यात उलटला. डोंग्यातील सर्व नऊ जण पाण्यात पडले. त्यापैकी सात जण कसेबसे पोहत किनाऱ्यावर पोहोचले. मात्र मोहित रहांगडाले व कुणाल भोंडे या दोघांना पोहता येत नसल्याने ते खोल पाण्यात गेले व बुडाले. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक व मच्छीमार मदतीसाठी धावले.
घटनेची माहिती मिळताच तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक प्रशासन, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले. आमदार रहांगडाले यांनी स्वतः घटनास्थळी थांबून मदत व बचाव कार्याला गती दिली. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने पाण्यात शोधमोहीम राबवण्यात आली.
अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर सायंकाळी उशिरा मोहित व कुणाल यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेने बरबसपुरा गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे. मोहित व कुणाल हे दोघेही तरुण, होतकरू व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तिरोडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहेत. ज्या डोंग्यातून हे तरुण नौका विहार करत होते तो मच्छीमारांचा पारंपरिक डोंगा होता. त्यात कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने, लाईफ जॅकेट नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.
आमदार विजयभाऊ रहांगडाले यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. “ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. तरुण मुलांचा असा अंत मनाला चटका लावणारा आहे. प्रशासनाने बोदलकसा सारख्या पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवावी. डोंग्याने फेरफटका मारताना लाईफ जॅकेट बंधनकारक करावे,” अशी मागणी त्यांनी केली. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बोदलकसा जलाशय हे तिरोडा तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. सुट्टीच्या दिवशी येथे नागरिकांची मोठी गर्दी होते. मात्र येथे कोणतीही ठोस सुरक्षा यंत्रणा नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जलाशय परिसरात सूचना फलक, सुरक्षा रक्षक व लाईफ गार्ड नेमण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण तिरोडा तालुका सुन्न झाला आहे.









