तिरोड्यात किरकोळ वादातून बीएसएफ जवानांकडून थरारक गोळीबार
एक जखमी; शहरात भीतीचे सावट, आरोपी जवानाला अटक
दै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत एका थरारक घटनेने हादरून गेले. गोंदिया तिरोडा महामार्गावर वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांत एवढा चिघळला की, एका बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल बाहेर काढून गोळीबार केला. या घटनेत एका व्यक्तीच्या हनुवटीला गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. या धक्कादायक घटनेनंतर तिरोडा शहरात काही काळ भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूषण दिसले असे आरोपी जवानाचे नाव असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रहिवासी आहे. तो सध्या पंजाब येथे बीएसएफच्या एका बटालियनमध्ये कार्यरत असून सुट्टीवर गोंदिया जिल्ह्यात आपल्या नातेवाईकांकडे आला होता. दरम्यान, रात्रीच्या सुमारास तो तिरोडा शहरातील सब्जी मंडी मार्गावरून वाहनाने जात असताना स्वानंद पारधी यांच्याशी वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून किरकोळ शाब्दिक वाद झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सुरुवातीला हा वाद सामान्य भांडणासारखा वाटत होता. मात्र, काही क्षणांतच वातावरण तणावपूर्ण बनले.
रागाच्या भरात जवानाने आपल्या वाहनाच्या डिकीतून पिस्तूल बाहेर काढले आणि रस्त्यावर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. क्षणार्धात झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गोळी थेट एका व्यक्तीच्या हनुवटीला चाटून गेल्याने तो जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या जखमीला स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमीची प्रकृती सध्या स्थिर आहे. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या तिरोडा शहरात भररस्त्यात झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. “वाद झाला म्हणून थेट बंदूक बाहेर काढणे ही अत्यंत गंभीर बाब आहे,’ अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या जवाना विरोधात तिरोडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी जवानाला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या घटनेमुळे कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणांतील सदस्यांनी संयम आणि जबाबदारीचे भान राखण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.एका क्षणाच्या संतापाने संपूर्ण शहराचे वातावरण ढवळून निघाले असून,तिरोड्यातील या गोळीबाराची चर्चा सध्या सर्वत्र रंगताना दिसत आहे.









