अखेर मायाबाईंची मृत्यूशी झुंज संपली
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली तालुक्यातील उमरझरी येथील माया रामकृष्ण सोनवाने (वय ५०) यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली. काल ०१ एप्रिलला रात्री १०:४५ ला नागपुरात दुःखद निधन झाले. मायाबाईच्या अकाली जाण्याने सोनवाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवार २८ मार्चला सकाळी ८ वा. त्या शेतात मिरच्या तोडत असता अचानक वाघाने त्यांवर हल्ला केला होता. प्रथम साकोली व नंतर नागपुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सलग पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या मायाबाईंची ही झुंज संपली असून त्यांचे दुःखद निधन झाले आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माणुसकी वतत्परता दाखविली असती व त्याच दिवशी जर मायाबाई सोनवणे यांना खाजगी रुग्णालयात उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांच्या जीव वाचला असता अशी चर्चा आज गावकऱ्यात होती. पट्टेदार वाघाने मायाबाई सोनवणे यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांना साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयातउपचाराकरिता आणण्यात आले.
परंतु यावेळेस वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निकेश धनविजय यांनी वेळेवर निर्णय न घेतल्यामुळे मायाबाईला पुढील उपचाराकरिता नेण्यास उशीर झाला व त्याच दिवशी मायाबाई यांना लकवा मारला. त्यामुळे त्या कोमात गेल्या होत्या. त्यानंतर गावकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला व गावकऱ्यांनी साकोली तिरोडा मार्ग जाम करून पण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात बंड पुकारला होता. परंतु नंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खाजगी उपचाराकरिता परवानगी दिल्यामुळे कोमात गेलेल्या मायाबाई यांना नागपूर येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तिथे त्यांची प्रकृती अधिक खालावली व दिनांक एक एप्रिलच्या रात्री मायाबाई ची झुंज संपली.









