विधानसभेत राजकुमार बडोलेंनी उपस्थित केले गोंदिया जिल्ह्यातील विविध मुद्दे
मुंबई:- महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, अजर्ुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदन करताना राज्यातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील आणि अजर्ुनी मोरगाव क्षेत्रातील विविध समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर सदनाचे लक्ष वेधले. बडोले, जे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे माजी मंत्री राहिले आहेत, त्यांनी आपल्या भाषणात स्थानिक नागरिकांच्या रोजगार, शेती, महिला सक्षमीकरण, दिव्यांग कल्याण आणि सांस्कृतिक वारसा यासारख्या मुद्द्यांवर जोरदार मागण्या केल्या. त्यांच्या या आवाजाने विधानसभेत गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भागातील समस्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
बडोले यांनी प्रामुख्याने गोंदिया जिल्ह्यातील बेरोजगारीच्या समस्येवर बोलताना सांगितले की, क्षेत्रातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्टील प्रोसेसिंग यूनिटची स्थापना आवश्यक आहे. “गोंदिया जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या मागास आहे. स्टील प्रोसेसिंग यूनिटमुळे हजारो तरुणांना रोजगार मिळेल आणिअर्थव्यवस्था मजबूत होईल,’ असे त्यांनी सदनात सांगितले. याशिवाय, शेतकऱ्यांच्या समस्या हाताळताना त्यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुरेशा उपाययोजनांची मागणी केली. “या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रस्त्यांची सुविधा मिळाली पाहिजे, ज्यामुळे त्यांची उत्पादने बाजारात सहज पोहोचतील,’ असे बडोले म्हणाले. शेतीशी संबंधित आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलताना बडोले यांनी फीडर सेपरेशनमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले.
“फीडर सेपरेशनच्या नावाखाली शेतकऱ्यांना वीज पुरवठ्यात अडचणी येत आहेत. यामुळे सिंचन आणि शेतीच्या कामांना मोठा फटका बसतो आहे. सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा,’ अशी मागणी त्यांनी केली. महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात, राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला. “ही योजना गरजू महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी याची गरज आहे,’ असे बडोले यांनी नमूद केले. दिव्यांगांच्या कल्याणावर बोलताना बडोले यांनी सांगितले की, राज्यात २०० पेक्षा जास्त दिव्यांग शाळा बंद करण्यात आल्या आहेत. “दिव्यांग मुलांच्या शिक्षणावर याचा विपरीत परिणाम होत आहे. दिव्यांग कल्याण विभागात संवेदनशील आणि समर्पित अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी,’ अशी जोरदार मागणी त्यांनी केली. सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाच्या संरक्षणावरही बडोले यांनी विशेष भर दिला. मुंबई विद्यापीठात पाली भवन निर्माण करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भिक्खूंच्या विरोधात मारहाण आणि गुन्हे दाखल करण्याच्या घटनेचा त्यांनी निषेध केला. “भिक्खूंना मारहाण करणे हे दुर्दैवी आहे.
मुंबई विद्यापीठात पाली भवन त्वरित निर्माण करण्यात यावे आणि उदर्ू अकादमीच्या धर्तीवर पाली अकादमी सुरू करण्यात यावी,’ अशी त्यांनी मागणी केली. याशिवाय, भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नालासोपारा येथील प्राचीन बौद्ध स्तूपच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेले ५ कोटी रुपये अद्याप दिले नसल्याचे त्यांनी उघड केले. “हे निधी तातडीने उपलब्ध करून देऊन स्तूपचा विकास करावा,’ अशी मागणी बडोले यांनी केली. गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन विकासावर बोलताना बडोले यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या प्रतापगड पर्यटन स्थळाला “ब’ वर्गाचा दर्जा देण्याची मागणी केली. “प्रतापगड हे धार्मिक सौहार्दाचे प्रतीक आहे. त्याला “ब’ वर्गाचा दर्जा मिळाल्यास पर्यटन वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल,’ असे ते म्हणाले. तसेच, बौद्ध धर्माचा प्रसार करणाऱ्या राज्यातील लेण्यांचा विकास करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याची मागणी त्यांनी केली.
गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे झाडीपट्टीचे भाग असल्याचे सांगत बडोले यांनी या भागात झाडीपट्टी संमेलन आयोजित करण्याची आणि नवेगाव बांध येथे झाडीपट्टी नाट्य कला अकादमी स्थापन करण्याची मागणी केली. “झाडीपट्टी भागातील सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा जपण्यासाठी हे आवश्यक आहे. संमेलनामुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळेल,’ असे बडोले यांनी अधोरेखित केले. राजकुमार बडोले हे अजर्ुनी मोरगाव विधानसभेचे आमदार असून, त्यांनी आपल्या क्षेत्रातील समस्या विधानसभेत उपस्थित करून स्थानिक नागरिकांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या भाषणाची सोशल मीडिया वर विशेष चर्चा होत असून नागरिकांतर्फे कौतुक होत आहे.









