आंघोळीसाठी गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा वैनगंगेच्या पात्रात बुडून मृत्यू

सिहोरा :- आज 14 जानेवारी, मकर संक्रांतीचा उत्साह सर्वत्र असतानाच, तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तामसवाडी येथे एक काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. दुपारी 12.30 च्या सुमारास वैनगंगा नदीच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांपैकी क्षितिज लीलाधर लांजेवार (15) या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सणासुदीच्या दिवशी ऐन तारुण्यात एका उमद्या मुलाचा असा अंत झाल्याने केवळ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण गाव सुन्न झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरला येथील पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यालयात इयत्ता 10 वीत शिकणारे तीन मित्र—क्षितिज लांजेवार, आर्यन श्रीराम ठाकरे आणि रुद्र पिंटू अमृते संक्रांती निमित्त वैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही खोल पाण्यात ओढले गेले आणि जीव वाचवण्यासाठी धडपडू लागले. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या मनोज केवट या तरुणाने आपल्या प्राणाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली आणि आर्यन व रुद्र या दोघांना मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढले. दुर्दैवाने, क्षितिजला वाचवण्यात त्याला यश आले नाही.
क्षितिज हा अभ्यासात अत्यंत हुशार होता आणि त्याचे भविष्य उज्ज्वल होते, मात्र नियतीने त्याच्यावर घाला घातला. अनेक लोकांच्या डोळ्यादेखत ही हृदयद्रावक घटना घडली. पोलीस आणि गावकऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर क्षितिजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ज्या घरात सणाचा उत्साह असायला हवा होता, तिथे आता फक्त आक्रोश आणि हुंदके ऐकू येत आहेत. एका निष्पाप जिवाच्या जाण्याने तामसवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नदी पात्रातील धोक्यांबाबत पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.









