कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणार

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासंबंधी लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिले. यामुळे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून समग्र शिक्षा संघर्ष समितीने सुरू करण्यात आलेले उपोषण मागे घेण्यात आले.

शासन सेवेत समायोजन करावे या मागणीसाठी समग्र शिक्षा योजनेतील कर्मचाऱ्यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सोमवारी (दि. ८) आमरण उपोषणाला प्रारंभ केला होता. समग्र शिक्षा योजनेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत शासन सेवेत समायोजन करावे किंवा स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी या मागणीसाठी समग्र शिक्षा संघर्ष समितीतर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.

टाळीनाद, घंटानाद, शंखनाद, आत्मक़्लेश आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासंबंधी लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसा शासन निर्णय जारी करण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे ही उपस्थित होते. मुख्यमंत्री भेटी प्रसंगी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने संघटनेच्या राज्याध्यक्ष योगिता बलाक्षे, राज्य सरचिटणीस पराग चारीटोकर उपस्थित होते.

८ दिवसात आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर आंदोलनाच्या ७ व्या दिवसापासून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य मुलाबाळासह या आंदोलनात सहभागी होतील असा इशारा कार्याध्यक्ष विरेंद्र गौतम, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी समग्र शिक्षा जिल्हा परिषद भंडारा तसेच कायदेशीर सल्लागार वैशाली नगराळे विषयतज्ञ समग्र शिक्षा पंचायत समिती साकोली, दिपाली बोरीकर, डॉ. मुरलीधर रेहपाडे, स्मिता चौरे, विवेक बोरकर, रामकृष्ण वाढीभस्मे, मनोजकुमार हलमारे, सुनील मोटघरे, रामरतन भाजीपाले, अरुण झुरमुरे, कालिदास गहाणे, राहुल बडोले, अशोक हटवार, सेवकराम शरणागत, प्रमोद सोनवाणे, अनिल येले, मुलचंद गहाणे, वंदना भोवते, संजयकुमार नंदुरकर, अमोल कांबळे, प्रकाश काळे, देवानंद कापसे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *