समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचा “करो या मरो’चा इशारा
दै. लोकजन वृत्तसेवा सिल्ली /आंबाडी :- सरकारी सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील ६८ समग्र शिक्षा अधिकारी / कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन तसेच हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषण तसेच अन्नत्याग आंदोलन पुकारले असून नोकरीत कायम करा किंवा स्वेच्छा मरणाची परवानगी द्या. अशी मागणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गटसधान केंद्र निम्मे रिकामे झाले असून शैक्षणिक कामावर परिणाम पडल्याचे चित्र आहे. समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील १८ ते २० वर्षांपासून, अतिशयतुटपुंज्या मानधनात, प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. महाराष्ट्र शासनाने शासनाच्या विविध विभागातील कंत्राटी रोजंदारी व ठेका तत्त्वावरील कर्मचारी यांना सेवेत कायम केलेले आहे.
राज्यात शासनाने नुकतेच, एनआरएचएम योजनेमधील कंत्राटी कर्मचारी व समग्र शिक्षा योजनेतील पन्नास टक्के कंत्राटी कर्मचाऱ्यांना दि. ८ ऑक्टोंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार सेवेत कायम केले आहे. मात्र अर्ध्या कर्मचाऱ्यांनाशासन सेवेत अद्याप समायोजन करून कायम केले नाही. त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाने, मानवतेच्या दृष्टीकोनातून आम्हालाही सेवेत कायम करावे. अन्यथा स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी या मागणीसाठी ८ डिसेंबर पासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात कर्मचाऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण पुकारले.
यात जिल्ह्यातील मोठ्या संख्येने समग्र कर्मचारी सहभागी झाले असून विरेंद्र गौतम, प्रकाश काळे, सुशिल कानेकर, देवानंद कापसे, मनोज धावडे, फाजेला यासीनी, मंगला पराते, अमोल कांबळे, संपदा लाखडे, वनिता कोरे, हेमलता नागदेवे, अरुण झुरमुरे, अश्विन रामटेके, रामकृष्ण वाडीभस्मे इत्यादींचा समावेश आहे.









