अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ११ हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दै. लोकजन वृत्तसेवा मुंबई/भंडाराः- राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा लाभ ४० लाख शेतकऱ्यांना होतो आहे. आणखी ११ हजार कोटी रुपये वितरित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे सांगितले. ही मदत पुढच्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी ११ हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आल्याने मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही. पुढील १५ दिवसांत ही मदत अतिवृष्टग्रस्त जिल्ह्यातील किमान ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी जशा याद्या मिळाल्या, तसा निधी वितरित करण्यात आला. ज्यांना केवळ दोन हेक्टरसाठी मदत मिळाली आहे, त्यांना पुढील हेक्टरसाठीचेअर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत, तर काहींच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले. या सर्व बाबी तपासून उर्वरित १० टक्के शेतकऱ्यांपर्यंतही तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुणीही पात्र शेतकरी मदतपासून वंचित राहू नये व अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जावू नये, यासाठी ई-केवायसी केली जात आहे. ॲग्रीस्टॅकचा डेटा राज्य शासनाकडे असून यामध्ये ज्या शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यांची पुन्हा ईकेवायसी केली जात नसून सहायता निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *