जिल्हा काँग्रेसतर्फे मोदी शासनाच्या व्देषपूर्ण व सूडबुद्धीने केलेल्या कारवाईच्या विरोधात आंदोलन
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा येथे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वाखाली त्रिमूर्ती चौकात काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासह समाजकल्याण सभापती शितल राऊत जि. प. भंडारा, जि. प. सदस्य प्रेम वणवे, जि. प. सदस्य देवा इलमे, जि. प. सदस्या अनिता भुरे, भंडारा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, लाखनी तालुका काँग्रेस अध्यक्ष योगराज झलके, विजय कापसे, धनंजय तिरपुडे, रिजवान काझी, रवि तिरपुडे, शमीम शेख, अरुण गडकरी, भाऊ कातोरे, पृथ्वीराज तांडेकर, चंदू कावळे, विपिन बोरकर, उदाराम भोवते, विजय शहारे, शैलेश पडोळे, योगेश गायधने, साहिल मेश्राम, हेमंत बडवाईक, राधे भोंगडे, दिलीप कोटवानी, बिट्टू सुखदेवे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे.
काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व खासदार राहुलजी गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. या आधीही ईडीने सोनियाजी व राहुलजी यांची चौकशी केली आहे. काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल, असे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी सांगितले. गौरवशाली इतिहास असलेल्या नॅशनल हेरॉल्ड दैनिकाला सध्याचे काँग्रेसद्वेषी सरकार बदनाम करणार नाही तर, दुसरे काय करणार आहे? काँग्रेस पक्षाचा द्वेष करण्याचे आणि नॅशनल हेरॉल्डला बदनाम करण्याचे ह्या सरकारकडे एक मजबूत कारण आहे. ते म्हणजे, ह्या सरकारची मातृसंस्था व यांचे सर्वच पूर्वज स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले नव्हते. यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा अनेकवेळा विरोध देखील केलेला आहे. आज नाही तर उद्या भारतीय ज्यावेळी यांना हा प्रश्न विचारतील त्यावेळी यांच्याकडे तोंड लपविण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक राहणार नाही. म्हणूनच याठिकाणी ते काँग्रेस पक्षाचा द्वेष करतात व, त्याकरिता नॅशनल हेरॉल्ड दैनिकाच्या एका प्रकरणाचा ते प्रभावी हत्यार म्हणून वापर करायला लागलेले आहेत. पण, हे हत्यार असत्यावर आधारित असल्याने पूर्णपणे बोथट आहे. व त्यांच्या ह्या बोथट अशा हत्याराने काँग्रेस पक्षाचे किंवा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे इथे काहीच नुकसान होणार नाही.