प्रेमसंबंधांच्या वादातून मित्राचा खून करणाऱ्यास अटक

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- प्रेमसंबंधातून झालेल्या वादाच्या परिणतीने तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे प्रेमसंबंधाच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची तसेच १६ वर्षीय मुलीचा खुनाचा प्रयत्न केल्याची घटना दि. २३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारस घडली. त्यानंतर फरार झालेला आरोपी रामेश्वर उर्फ मुन्ना संपत बिरनवारे (३५) रा. आंबेडकर वार्ड देव्हाडी, ह. मु. नेहरू वार्ड देव्हाडी यास तुमसर पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. मृतकाचे नाव अंकुश श्रीपत साठवणे (३५) रा. सुभाष वॉर्ड देव्हाडी असे असून तो ग्रामपंचायत सदस्य होता. सविस्तर असे की, मृतक अंकुश साठवणे आणि आरोपी रामेश्वर उर्फ मुन्ना बिरनवारे हे चांगले मित्र होते. मात्र, काही दिवसांपूर्वी मृतकचे आरोपीचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणामुळे त्यांच्यात मोठा वाद झाला होता. त्यानंतर अंकुश नागपूरला जाऊन राहू लागला होता.

मात्र, २२ मार्च रोजी तो पुन्हा देव्हाडीला परतला. २३ मार्च रोजी, मृतकाचे वडिल श्रीपत हेमराज साठवणे यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी आरोपी मुन्नालाआपल्या घरी बोलावले. समेटाची चर्चा सुरू असतानाच मुन्नाने अचानक त्याच्या सोबत आणलेल्या चाकूने अंकुशवर सपासप पोटावर, मांडीवर, पाठीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या अंकुशचा जागीच मृत्यू झाला. श्रीपत साठवणे यांनी १६ वर्षीय नातीन आकांक्षा संतोष साठवणे हे मध्यस्थी करायला गेली असता तिलाही चाकु मारून गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

दरम्यान, आरोपी मुन्ना बिरणवारे हा हत्येनंतर फरार झाला होता. तुमसर पोलिसांनी तात्काळ शोध मोहिम राबवून मध्यरात्री आरोपी रामेश्वर उर्फ मुन्ना बिरनवारेयाला मध्यरात्री अटक केली. फिर्यादी श्रीपत हेमराज साठवणे (६३) रा. सुभाष वार्ड देव्हाडी याने दिलेल्या तोंडी तक्रारीवरुन पो.स्टे. तुमसर येथे अप. क्र. १६५/२०२५ कलम १०३ (१), १०९ भारतीय न्याय संहीता-२०२३. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश साखरे करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देव्हाडी गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या हत्याकांडामुळे प्रेमसंबंधातून होणाऱ्या गुन्ह्यांबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा रंगली असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *