महिलांनी सावित्रीबाई फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावे-जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महिला व युवतींनी सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करावा. त्याचे फायदे व धोके सुध्दा आहेत. महिलांची उत्क्रांती होण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अतोनात हाल अपेष्टा सहन केल्यामुळे आज महिलांनी देशातील विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. हे केवल सावित्रीबाईची पुण्याही आहे. भंडारा नगर परिषदचे अधिकारी अभिमानाचे पात्र आहेत. कारण नगर परिषदेच्या विविध योजनाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करून मोठी फळी तयार केली आहे. त्या माध्यमातून भारतातील सर्व थोर महिलांच्या वेशभूषात महिला दिसत आहेत. त्यातच महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. म्हणून महिलांनी सावित्रीबाई फुलेंचे आदर्श डोळ्या समोर ठेवून स्वत: बरोबरच जिल्ह्याचे नाव लौकिक करावे असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांनी केले.
त्या संताजी मंगल कार्यालयात आयोजित नगर परिषद भंडारा बालकल्याण समिती व दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. सदरकार्यक्रम नगर परिषद मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्राक्षी आय केअर च्या संचालिका नेत्ररोग तज्ञ डॉ. विशाखा जिभकाटे होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. नितीन तुरस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, नगर परिषद प्रशासकिय अधिकारी प्रगती वाघमारे, नगर परिषदेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे, प्रकाश बान्ते, शहर स्तर संघ अध्यक्ष रंजना साखरकर, उपाध्यक्ष सुनंदा कुंभलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, मार्ल्यापण व दीप प्रज्वलित करण्यात आले. तसेच स्वागत गीताने स्वागत करून स्मृतीचिन्ह व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. नितीन तुरस्कर यांनी स्वत:चे विविध उदाहरणे देऊन महिलांनी न घाबरता विविध क्षेत्रात समोर जाणे गरजेचे आहे. आवश्यक असल्यास कठोर व्हावे. स्पर्धेच्या युगात वावरत असतांना महिला व युवतींनी चांगल्या गोष्टींची स्पर्धा करावी, मात्र त्यापासून स्वत:ला किंवा दुसऱ्या इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. महिलांनी विविध प्रकारच्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्तर उंचावले आहे. आणि त्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याची ओळख कशी निर्माण करता येईल याकरिता सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मत मांडले. कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा, ग्रीन मॅचिंग स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात व्यक्तिगत समूह नृत्यांनी रसिकांचे मने जिंकली. त्यादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या विद्यार्थीनींचा, गुणवंत विद्यार्थिनी, स्वच्छता कर्मचारी, प्रशासकीय, सामाजिक व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या दरम्यान आरोग्य तपासणी शिबीरात हिमोग्लोबिन, शुगर बिपी इत्यादी तपासणी करण्यात आली.
इंद्राक्षी आय केअर च्या संचालिका नेत्ररोग तज्ञ डॉ. विशाखा जिभकाटे यांनी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. कारण आपल्यावर कुंटूबांचे गाढे चालत असते. अशाप्रकारे अमृततुल्य मार्गदर्शनाचे बाळकडू पाजले असून कोटी कोटी अमृताचे दोन थेंब महिलांना मिळत राहो अशा शुभेच्छा दिल्या. तसेच नगर परिषद प्रशासकिय अधिकारी प्रगतीवाघमारे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्व व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, नगर परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या नियमानुसार जाले तयार झाले असून बचत गटांच्या वस्तीस्तर संघटना, शहर स्तर संघटना तयार करून समाजात महिलांना आत्मनिर्भर गरूड झेप घेण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले जाते.
या योजनेतून आर्थिक लाभ मिळत असून त्यांच्या कुटुंबियांना सुखाचे दिवस आले असल्याचे मत नगर परिषदेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे यांनी सांगितले. संताजी मंगल कार्यालय अपूरे पडत होते. महिला मेळाव्यात दोन हजारांच्या वर महिलांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर परिषदेच्या समुदाय संघटिका रेखा आगलावे व प्रास्ताविक शहर स्तर संघ अध्यक्ष रंजना साखरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार उषा लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नगर परिषदेचे सर्व सीआरपी, सीएलएफ व सीएलसी, नगर परिषदेचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच महिला बचत गटाच्या महिलांनी सहकार्य केले.