ढोलताशाच्या गजरात श्री गणेशाचे जल्लोषात आगमन

❖ दहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन ❖ आकर्षक देखावे ❖ पोलिसांचा चोख बंदोबस्त
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- भंडारा जिल्ह्यात आज गणेश भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातभरात जल्लोषात गणरायाचे आगमन झाले.

सकाळपासून घरोघरात आणि चौकाचौकात ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष घुमत होता. यंदा गणेश स्थापनेची वेळ दुपारपर्यंत असल्याने सकाळपासून सार्वजनिक गणेश मंडळांची मूर्ती आणण्यासाठी लगबग सुरू झाली होती. ट्रॅक्टर, बैलगाडी आणि फुलांनी सजवलेल्या वाहनांमधून बाप्पाच्या मूर्ती आणल्या जात होत्या. खाजगी घरगुती गणपती आणण्यासाठीही भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे

एक गाव – एक गणपती संकल्पना
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये यंदाही ‘एक गाव – एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. गावातील सर्व समाज एकत्र येऊन एकच सार्वजनिक गणपती बसवत असल्याने ऐक्य आणि एकोप्याचे दर्शन घडत आहे. यामुळे खर्चालाही आळा बसतो आणि उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करता येतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

अनेक घरगुती गणपती बसवणाऱ्या भाविकांनी एक दिवस आधीच मूर्ती आणून घरात ठेवली होती, जेणेकरून स्थापनेच्या दिवशी गडबड होऊ नये. आज सकाळी शुभ मुहूर्तावर विधिवत प्राणप्रतिष्ठा करून बाप्पाची स्थापना करण्यात आली.

सार्वजनिक मंडळांनी यंदा आकर्षक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले आहेत. कुठे ऑपरेशन सिंदूर, कुठे पर्यावरण संरक्षण, तर कुठे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील देखावे आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. पुढील दहा दिवस जिल्ह्यात भक्तिमय वातावरण राहणार असून विविध मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात १७ ही ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्थेत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

डीजे बंदीचा परिणाम
ढोल-ताशांना पसंतीयंदा प्रशासनाने डीजे वर बंदी घातल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. बहुतांश सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करीत ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या मूर्ती आणल्या. ढोल-ताशा पथकांच्या तालावर तरुणाई ठेका धरत होती. या मिरवणुकांमध्ये मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक वेशभूषेत महिलांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
गणेशोत्सव काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहाawi यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकानी सर्व मंडळांना शांततेत आणि नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली असून सोशल मीडियावरून पोलिसांचे बारीक लक्ष आहे.

महिलांची लगबग
यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे हरतालिका तीज आणि गणेश स्थापना एकाच दिवशी आल्याने महिलांची सकाळपासून मोठी धांदल उडाली. सकाळी लवकर उठून महिलांनी हरतालिकेची पूजा-अर्चना आटोपली आणि लगेचच घाईघाईत श्री गणेशाच्या स्वागताची आणि स्थापनेची तयारी सुरू केली. बाजारपेठेत पूजेचे साहित्य, फुले, फळे आणि मोदक खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *