खड्ड्यांनी घेतला चिमुकलीचा जीव; बायपासवर नागरिकांचे धरणे
एकलारी येथील विजय सेलोकर (५०) हे नेहमी प्रमाणे मुलांचे शिकवणी वर्ग आटोपून दुचाकीने परत जात होते. त्यांच्या सोबत मुलगी एकता व तिचा वर्गमित्र विराज कन्हैयालाल मारवाडे (११) होते. बायपास पुलावर गाडी चढवताना समोरून अचानक वाहनांची वर्दळ आली. दरम्यान पुलाच्या चढावावर असलेल्या खड्ड्यामुळे दुचाकींचा तोल गेला. यामुळे समोरून येणाऱ्या ट्रकची त्यांना जोरदार धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार व त्याच्या सोबत असलेली दोन्ही मुले निपचित पडली. काही वेळानंतर गावातील काही नागरिकांनी त्यांना उचलून रस्त्या शेजारी केले.
दरम्यान पोलीस घटनास्थळावर दाखल झाली व जखमींना तात्काळ उपचारासाठी भंडारा येथील खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. उपचारदरम्यान मुलीचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार विजय सेलोकर व विराज मारवाडे याना गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले. रस्त्याची देखभाल दुरुस्ती अभावी वर्दळीच्या रस्त्यावर अपघात वाढले आहेत. रस्त्याची डागडुगी करण्याची मागणी करूनही दुरुस्ती न झाल्याने संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी जवळपास २ तास रस्ता अडवून मागण्याचे निवेदन तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांना देण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक निलेश गिरी व सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक अभिजित पाटील ताफ्यासह घटनास्थळावर उपस्थित होते. रस्ता रोको आंदोलनात सरपंच चांगदेव रघुते, उपसरपंच अनिता गजभिये, माजी सभापती रितेश वासनिक, माजी उपसरपंच मनोज सुखानी, सामाजिक कार्यकर्ते बाबुलाल बोन्द्रे, माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे, अश्विन शेंडे, अरविंद येळणे, मुकेश गोमाशे, विलास कुथे, थारणोद डाकरे, ग्राम पंचायत सदस्य सीमा डोंगरे, संगीता सुखानी, भाऊदास नंदागवळी, रवी बोरकर, आनंद गजभिये, तंटा मुक्त समिती अध्यक्ष चेतन डांगरे, आकाश काकडे, संदीप बोन्द्रे, अतुल चौधरी उपस्थित होते.