पत्रकारांनी निर्भिडपणे कार्य करावे – अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “पत्रकारांनी निर्भिडपणे बोलून चुका आमच्यापर्यंत मांडाव्यात. समाजाच्या विकासासाठी प्रशासन व पत्रकारांनी एकत्र काम केले पाहिजे” असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी केले. व्हॉइस ऑफ मीडिया भंडारा जिल्हा यांच्या वतीने जिल्हा व तालुका कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा तसेच पत्रकार कार्यशाळेचे आयोजन साई प्लाझा हॉटेल भंडारा येथे करण्यात आले. येथे जिल्ह्यातील सर्व पत्रकार व नवनियुक्त तालुका अध्यक्ष आणि त्यांची चमू उपस्थित झाली होते. या सोहळ्याला प्रमुख अतिथी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश मोरे, प्रमुख वक्ते व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय समन्वयक व संचालक किशोर कारंजेकर, राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष निलेश पिंजेकर, भंडारा जिल्हाध्यक्ष शशीकांत भोयर, काशिनाथ ढोमणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर यांनी करीत सांगितले की, पत्रकारांमध्ये आपल्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी जागतिक स्तरावरील संघटनेत सामिल होण्यासाठी उत्साह हवा असतो. आज सर्व पत्रकारांची एकजूटता पाहून गदगदून गेलो आहे. पत्रकारांवर कोणतेही संकट आले तर मी जिल्ह्यात खंबीरपणे उभा आहे असे म्हणाले. याप्रसंगी मंचावरून वर्धा जिल्हाध्यक्ष निलेश पिंजेकर म्हणाले की, कोरोना काळात अनेक पत्रकारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्याच काळात संदीप काळे सरांनी एका पत्रकार मित्राला मदत करताना विचार केला की, पत्रकारांसाठी संघटना हवी. बुलढाण्यातील छोट्याशा गावातून व्हॉइस ऑफ मीडियाचा जन्म झाला आणि आज जगातील ७३ देशांत ही संघटना कार्यरत आहे. न्यायासाठी संघटन शक्तीची आवश्यकता आहे व पत्रकार हानेहमी निर्भिड असावा.
राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख म्हणाले, आपली लढाई प्रशासकीय अधिकाऱ्यांशी आहे. त्यामुळे कार्यक्रमाला अधिकाऱ्यांना निमंत्रित करावे. पत्रकारांनी एकजूटतेची शक्ती दाखवावी. राष्ट्रीय समन्वयक किशोर कारंजेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, पत्रकारांच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले आहे. पत्रकारांच्या भविष्यासाठी संघटना सतत कार्यरत राहील. आपल्या भाषणात व पदग्रहण समारंभात बोलताना अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश मोरे म्हणाले, २००२ पासून पोलीस खात्यात काम करत असताना अनेक जिल्ह्यांतील पत्रकार बांधवांचे फोन येतात. चुकीचे काम निदर्शनास आणून दिल्यास त्यावर कारवाई होते. चांगल्या कामाची दखल घेऊन सत्कारही केला जातो.
पत्रकारांनी निर्भिडपणे बोलून चुका आमच्यापर्यंत मांडाव्यात. समाजाच्या विकासासाठी प्रशासन व पत्रकारांनी एकत्र काम केले पाहिजे. लोकशाहीची मूल्ये व संविधानिक तत्त्वांचे पालन करताना पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे. यावेळी पदग्रहण करण्याकरिता संविधानाच्या ग्रंथाला साक्षी ठेवून पत्रकारांच्या शपथ चे वाचन अतिरिक्त पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी पत्रकारांना शपथ दिली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार हिवराज उके, अनिल कारेमोरे व मनोज चिचघरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमात नवनियुक्त जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. बदलत्या काळातील पत्रकारितेची आव्हाने, डिजिटल मीडियाचा प्रभाव व पत्रकारांचेहक्क-जबाबदाऱ्या या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्ह्यातील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात संचालन व आभारप्रदर्शन साकोलीचे पत्रकार रवि भोंगाणे यांनी केले. यावेळी साकोली तालुका अध्यक्ष आशिष चेगडे, लाखनी तालुका अध्यक्ष कल्याण राऊत, पवनी तालुकाध्यक्ष चरणदास बावणे, तुमसर तालुकाध्यक्ष अनिल कारेमोरे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीत विशाल रणदिवे, अनमोल मेश्राम, हंसराज रामटेके, देवचंद टंबरे, कालिदास खोब्रागडे, अनिल शेंडे, प्रकाश हातेल, डी. जी. रंगारी, किशोर गडकरी, मनोज चिचघरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राकेश शामकुवर, अनमोल मेश्राम, हंसराज रामटेके, उमेश जांगडे, सुशील चौधरी, मुकेशकुमार मेश्राम, विलास केजरकर, समीर नवाज यांच्यासह इतर पत्रकारांनी सहकार्य केले.









