तीव्र उष्णतेतही निघाले ओबीसींचे “पिवळे वादळ’
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जनगणनेच्या “घरसुची अर्जात कॉलम १२ मध्ये ओबीसीचा उल्लेख्ा करून ओबीसी जाती समोर ओबीसी प्रवर्ग लिहावे. भारतात ओबीसींची संख्या किती आहे याची माहिती व्हावी. “उच्च शिक्षक संस्थामध्ये समानतेच्या संवर्धनासाठी विनिमय २०२६’ कायदा लागू करावा व केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय सुरू करावे या मागण्यांना घेवून आज ओबीसी संघर्ष समितीच्यावतीने भंडारा येथे महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात विदर्भातून हजारोंच्या संख्येत ओबीसी बांधव उपस्थित होते.
हा महामोर्चा सकाळी ११ वाजता दसरा मैदान येथून काढण्यात आला. “जातनिहाय जनगणना करा’, “ओबीसी एकता जिंदाबाद’, “आमचा हक्क, आमचे आरक्षण’, “शिक्षण आमचा हक्क’, “ज्यांची जेवढी संख्या, त्यांचा तेवढा वाढा’ आदी घोषणांनी संपूर्ण भंडारा शहर दणणाला. ठिकठिकाणी पिण्याचेपाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालया समोर येताच मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी ओबीसी संघर्ष समिती जिल्हा भंडाराचे मुख्य समन्वयक सदानंद इलमे व प्रभाकर वैरागडे, समन्वयक डॉ. बाळकृष्ण सार्वे, भगीरथ थोटे, संजय मते, निमंत्रक रोशन उरकुडे, गोपाल सेलोकर, ललिता देशमुख, प्रा. जयंत झोडे लाखांदूर, धनंजय बिरणवार यांच्यासह इतर ओबीसी पदाधिकारी मंचावर उपस्थितहोते. राजकीय नेत्यांना मंचाच्या बाजुला बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी ओबीसी नेत्यांनी तसेच राजकीय नेत्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केंद्र सरकार ओबीसींवर कशाप्रकारे अन्याय करीत आहे, हे सांगितले. यासाठी ओबीसींनी एकत्रित येणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. मोर्चाचे वेळी पोलिसांचाचोख बंदोबस्त होता. ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. मोर्च्याच्या यशस्वीतेसाठी ओबीसी सेवा संघ, ओबीसी महिला सेवा संघ, ओबीसी जनगणना परिषद, ओबीसी क्रांती मोर्चा, ओबीसी संघर्ष समिती, ओबीसी जागृती मंच, युथ फॉर सोशल जस्टीस व अन्य ओबीसींच्या संस्था व संघटनांचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले. सभेचे संचालन भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष संजय आजबले यांनी केले.









