तुमसर येथील पालकमंत्री जनता दरबारात २५४ निवेदन प्राप्त
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी तुमसर येथे जिल्हास्तरीय जनता दरबार आज घेतला. या दरबारात एकूण २५४ निवेदन प्राप्त् झाली होती. जिल्हयातील सर्व तालुक्यातील नागरिकांनी आज समस्या, निवेदन घेउून तहसील कार्यालयात गर्दी केली होती. यापूर्वी पालकमंत्री यांच्या निर्देशान्वये प्रत्येक सोमवारी तहसील पातळीवर जनता दरबार आयोजित करण्यात आले होते.
या जनता दरबाराला आमदार राजू कारेमोरे, पोलीस अधिक्षक नुरूल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे यांच्यासह नगराध्यक्ष सागर गभने, सभापती पंचायत समिती तुमसर दीपिका गोपाले, उपाध्यक्ष नगरपरिषद सचिन बोपचे, उपसभापती तुमसर सुभाष बोरकर, माझी खासदार मधुकर कुकडे,निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण, उपविभागीय अधिकारी उपेश अंबादे उपस्थित होते. पालकमंत्री यांनी यावेळेस बोलताना या उपक्रमातुन प्रशासन अधिक लोकाभिमुख होत असल्याचे सांगितले. माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशांवर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी जनता दरबारांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले या जनता दरबारात लोकांचा सक्रिय सहभाग पाहता या जनता दरबाराची आवश्यकता अधिक असल्याचे अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार राजु कारेमोर यांनी लोकशाही पध्दतीने नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा हा उपक्रम चांगला असून या आयोजनाबददल समाधान व्यक्त केले.
पालकमंत्री जनता दरबार हा गावपातळीवरील समस्या/निवेदनांचा निराकरण करण्याचा उपक्रम असुन हा याव्दारे तालुकास्तरावरील समस्या मार्गी लागत ज्या प्रलंबीत राहतील त्या दर सोमवारी शासन दरबारी सादर करण्याचे भोयर यांनी सांगितले. आज प्रामुख्याने पाणीपुरवठा शिक्षण तसेच रस्ते, कृषी विभाग, पट्टेवाटप, विकास कामांसाठी निधीची आवश्यकता, परिवहन विभागाकडे थांबासाठी निवेदन आदींचा समावेश होता. तसेच भोयर पुढे म्हणाले की,तालुकास्तरावर आज पर्यंत २३ जनता दरबारामध्ये आजवर अंदाजे १ हजार हून अधिक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, तक्रारी निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. या जनता दरबारात नागरिकांना निवेदनावर टोकन क्रमांक देण्यात आले होते. तसेच नागरिकांचे टोकन क्रमांक पुकारून त्यांना व्यासपीठावर पालकमंत्री महोदयांकडे प्रकरण सादर करण्यात येत होते. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यकता वाटल्यास विचारणा करून पालकमंत्री निर्देश देत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी उपेश अंबादे, संचलन शारदा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल डोंगरे यांनी व आभार निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांनी केले.









