बोली जपा, भाषा समृद्ध ठेवा; “बोलींच्या जागर’ मधून भाषा संवर्धनाचा संदेश
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय व समर्थ महाविद्यालय, लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे आयोजित करण्यात आलेला बोलींचा जागर हा विशेष कार्यक्रम शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. बोली जपा, भाषा समृद्ध ठेवा असा मराठी भाषा संवर्धनाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संताजी महाविद्यालय, पालंदुर येथील डॉ. संजयकुमार निंबेकर प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून विभागीय सहाय्यक भाषा संचालक बाबासाहेब जगताप, अधीक्षक संजयकुमार गोरे, समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबरकापसे, कोहळी बोलीवरील तज्ज्ञ प्रा. नरेश बाळबुद्धे, बोलींच्या इतिहासावर मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. नीलिमा कापसे तसेच कोहळी बोली संस्कृतीवर मार्गदर्शन करणाऱ्या प्रा. अलका दुधबुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथदिंडी, प्रभातफेरी, भजन व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे यांनी भाषा संचालनालय व महाराष्ट्र शासनाच्या “बोलींचा जागर’ या उपक्रमाचे कौतुक केले. असे उपक्रम सातत्याने राबविले गेल्यास बोलींचे निश्चितच संवर्धन होईल आणि विद्यार्थीदशेपासूनच विद्यार्थी आपल्या बोलीभाषेत अभिमानाने बोलू लागतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य समन्वयक बाबासाहेब जगताप यांनी केले. कोहळी बोलीवर मार्गदर्शन करताना प्रा. नरेश बाळबुद्धे म्हणाले की, कोहळी बोली ही अत्यंत समृद्ध व अभिव्यक्तिपूर्ण आहे. त्यामुळे केवळ प्रमाणभाषेपुरते मर्यादित न राहता दैनंदिन व्यवहारात तसेच लेखनवाचनातही बोलीचा अधिकाधिक उपयोग व्हावा, असे त्यांनी आवाहन केले. कोसरी बोलीवर भाष्य करताना प्रा. डॉ. संजयकुमार निंबेकर म्हणाले की, सध्या कोसरी भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र ही बोली लोकजीवनाशी घट्ट नाते जोडणारी असून तिचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. काळानुसार या भाषेचे स्वरूप बदलत गेले असून सध्या ती केवळ मौखिक परंपरेतच अस्तित्वात आहे.
भंडारा जिल्ह्यातील विविध बोली एकत्र येऊन आज “झाडी बोली’चा विकास झाला आहे. त्यामुळे बोलीचे जतन व संवर्धन झाले, तरच भाषा टिकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी भंडारा जिल्ह्यातील बोलीभाषेतील प्रसिद्ध झडत्यांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी बोलीभाषेतील गीत व पोवाड्यांचे सादरीकरण केले. प्रा. अलका दुधबुरे यांनी कोहळी समाजाची संस्कृती व परंपरा याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषा व उद्योग विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत व सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गिते यांचे विशेष सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी समर्थ महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. बंडू चौधरी, प्रा. अजिंक्य भांडारकर व प्रा. मिलिंद कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अजिंक्य भांडारकर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. मिलिंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बोलीभाषांबद्दल जाणीव निर्माण होऊन मराठी भाषेच्या विविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.









