विविधांगी भरगच्च कार्यक्रमाने गाजले लाखनीतील ग्रामीण युवा साहित्य संमेलन

 दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- येथील उत्सव सेलिब्रेशन हॉल अँड लॉन येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय साहित्य संमेलनाची यशस्वी सांगता झाली. दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी या साहित्य संमेलनाचा समारोपिय कार्यक्रम पार पडला. या समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध रंगकर्मी आणि समीक्षक प्रा. डॉ. संजयकुमार निंबेकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य जयू भाटकर हे उपस्थित होते.

गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे, जिल्हा परिषद सदस्य विद्याताई कुंभरे, प्राचार्य प्रल्हाद सोनवणे, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपाळकृष्ण मांडवकर, स्वागताध्यक्ष संजय वनवे, मुख्य संयोजक डॉ. सुरेश खोब्रागडे, आयोजन समितीचे अध्यक्ष रामेश्वर बिसेन, डॉ. रेवाराम खोब्रागडे, निमंत्रक डॉ. युवराज खोब्रागडे, प्राचार्या आशाताई वनवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर सत्कार मूर्ती म्हणून माजी आमदार हेमकृष्ण कापगते, माजी शिक्षणाधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक सी. एम. बागडे, भंडारा येथील ज्येष्ठ समाजसेवक आणि कवी अमृत बनसोड, लवारी उमरी येथील ज्येष्ठ साहित्यिक डोमाजी कापगते यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

मराठी भाषेचा विकास करीत असताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या दिशेने आपण जर प्रयत्न केला तर मराठी भाषेचे संवर्धन आणि संरक्षण होऊ शकते असे विचार याप्रसंगी जयू भाटकर यांनी व्यक्त केले तर सुभाष बावनकुळे यांनी संमेलनातील विविध कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनाबद्दल आनंद व्यक्त करून अशी साहित्य संमेलनेचे भाषा साहित्य आणि संस्कृतीला बळकटी प्राप्त करून देतात, असे विचार व्यक्त केले. साहित्य संमेलनात दोन परिसंवाद एक चर्चासत्र, अरुण बन्सोड यांची खडीगंमत, डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची प्रकट मुलाखत,पालिकचंद बिसेन यांचे बासरी वादन आणि झाडीपट्टीचा धुमधडाका, कविसंमेलन आणि महेंद्र गोंडाने यांचा सहावी बाळंतीण हा एकपात्री विनोदी प्रयोग असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी सर्व मान्यवरांचा शॉल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला. संमेलनात काही ठराव पारित करण्यात आलेत. वृद्ध लोककलावंतांच्या मानधनात वाढ करावी. अंध, दिव्यांग कलावंतांना मोफत सदनिका देऊन त्यांचा वृद्धापकाळात सन्मान करावा. नवीन शिक्षण प्रणालीत सुधारणा करून आधुनिक शेती, ग्राम उद्योग, युवक कल्याण, कुटीर उद्योग शेतकरी कल्याण इत्यादी क्षेत्रावर भर देऊन बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न व्हावा, या नवीन शैक्षणिक धोरणात बहुजनाला मोफत शिक्षण देण्यात यावे. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, लाखनी येथे सांस्कृतिक सभागृह, नाट्यगृह शासनाने उभे करावे, तालुका स्तरावरील आणि जिल्हास्तरावरील विविध संस्थांच्या छोट्या साहित्य संमेलनांना सुद्धा निधी देऊन सहकार्य करावे. असे काही ठराव या संमेलनात पारित करण्यात आले. दि. लिटल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या उद्गोषिका विना डोंगरवार आणि डॉ. युवराज खोब्रागडे यांनी केले. तर आभारप्रदर्शन संयोजक डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी केले. राष्ट्रगीताने समारोपीय कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सुरेश खोब्रागडे, डॉ. संजयकुमार निंबेकर, रामेश्वर बिसेन, रेवाराम खोब्रागडे संजय वनवे, प्रा. उमेश सिंगनजुडे, बाबुराव निखाडे, दिनेश पंचबुद्धे, नामदेव काणेकर, अश्विनी भिवगडे, रवी खोब्रागडे आणि द. लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॉलेज च्या सर्व शिक्षक वृंदांनी, कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *