लोकप्रतिनिधीने सुचवलेल्या कामांच्या याद्या प्रशासनाने सादर कराव्यात
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हयातील लोकप्रतिनीधींनी सुचवलेल्या कामांच्या यादया प्रशासनाने सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आज दिले जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या सभेत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. नाना पटोले, आ. राजू कारेमोरे, खा. डॉ. प्रशांत पडोळे, जिल्हाधिकारी सावन कुमार, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे, यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. ६ जून २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित पालकमंत्री डॉ. भोयर, खा.पडोळे, आ. पटोले, आ. भोंडेकर, आ. राजू व इतर सभेची इतीवृत्त कायम करण्यात आले.
भंडारा जिल्ह्यातील प्रश्न मांडताना खासदार पडोळे यांनी भागडी गावातील जलजीवन मिशन ने केलेल्या कामाबाबत प्रश्न निर्माण केले तसेच दूषित पाणी तसेच या गावात नागरिकांना पिण्याचे दूषित पाणी मिळत असल्याबाबतची बाब निदर्शनास आणून दिली. यावर पालकमंत्री यांनी याबाबत चौकशीचे निर्देश प्रशासनाला दिले व संबंधितावर कारवाई करण्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी २०२४-२५ मध्ये झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन विकास समिती द्वारे प्राप्त कामांचा आढावा जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरी गट्टे यांनी सादर केला. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत २०२५२०२६ अंतर्गत एकूण मंजूर नियतव्यय २७६ कोटी आहे .
दिनांक १ ऑगस्ट २०२५ च्या शासन मार्गदर्शक सूचनानुसार खरेदीची कमाल मर्यादा १०% तर पुनर्विनोयजनची कमाल मर्यादा १०% असुन सुधारित प्रशासकीय मान्यतेची मर्यादा सुद्धा ३० टक्के अनुदान करण्यात आलेली असल्याची माहिती श्रीमती बोरीगटटे यांनी दिली. २७६ कोटी रुपये मंजूर निधी पैकी ३० सप्टेंबर अखेरीस र्यंत ३०.७६% निधी खर्च झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली .पालकमंत्री श्री.भोयर यांनी विभागनिहाय कामाचा आढावा यावेळी घेतला. आमदार राजू कारेमोरे यांनी धान खरेदी व धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत तसेच बोनसचे पैसे मिळण्याबाबतचे प्रश्न मांडले. त्यावर धान खरेदी बाबत लवकरच मंत्रालयात स्वतंत्र बैठक लावणार असल्याचे श्री भोयर यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके यांनी जनसुविधेच्या कामासाठी निधी मिळण्याची मागणी केली.
शासकीय वैदयकीय महाविदयालयाबाबतच्या प्रश्नाबाबत आमदार भोंडेकर यांनी मांडलेल्या मुददयाची दखल पालकमंत्र्यांनी घेतली.जिल्ह्यातील वर्ग खोल्या व शाळा बांधकामासाठीचे प्रस्ताव तसेच नवीन रुग्णालय उभारण्याकरता आवश्यक असलेल्या जागेच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी महोदयांनी बैठक घेऊन याबाबतीतला अहवाल सादर करावा, असे सांगितले. आदिशक्ती शीतला माता मंदिर याला क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी खासदार डॉ.पडोळे यांनी केली. जिल्ह्यातील वन्य प्राणी व मानव संघर्ष याबाबत वनविभागाने सर्वेक्षण करून तसा अहवाल शासनास द्यावा, असे ही पालकमंत्री यांनी निर्देश दिले. सभेचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरीगट्टे यांनी केले. तत्पूर्वी जिल्हा नियोजन सभागृहातील तळमजल्यावर असलेल्या पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.सामान्य नागरिकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पालकमंत्री कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री कार्यालयाने केले आहे









