सेवा पंधरवाडयात सामुहिक प्रयत्नाने उद्दिष्ट साध्य करू – जिल्हाधिकारी
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोबर या जयंतीपर्यंत मोहीम स्वरुपात “सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्हयात या कार्यक्रमाला आजपासून सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवा पंधरवाडयात क्षेत्रीय पातळीवरील सर्व अधिकारी -कर्मचाऱ्यांनी सामुहिक प्रयत्नाने काम करून उददीष्ट साध्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हयातील प्रगतीशील शेतकरी रामभाऊ कडव, प्रकाश मस्के, विनोद चकोले, रामप्रकाश शेंडे, रामकृष्ण हातझाडे, प्रमोद लिचडे, तसेच विरमाता निरूप भोंदे, विरपत्नी किरण भोंदे तसेच विरपत्नी ज्योती सिंद्राम, उपस्थित होते.
यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके,महसुल उपजिल्हाधिकारी पुजा पाटील ,उपजिल्हाधिकारी भुसंपादन जे.पी .लोंढे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ -दांदळे यासह अनयब विभागप्रमुख उपस्थित होते. महसूली क्षेत्रीय कार्यालयाकडून जनतेस सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी २०२५-२६ या वर्षात मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी सावनकुमार म्हणाले की, शासनाने या पंधरवाडयात दिलेली उददीष्टे क्षेत्रीय अधिकारी -कर्मचाऱ्यांनी पार पाडावीत, या पंधरवडयानंतरही ही कामे सुरूच राहतील मात्र या पंधरा दिवसात याला मोहिम पातळीवर घेण्यात यावे. लोकाभिमुख सेवा देण्यासाठी आपण सर्व शासकीय यंत्रणा म्हणून सामुहिक प्रयत्न करू, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या अभियानामध्ये १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीतील पहिल्या टप्प्यामध्ये “पाणंद रस्तेविषयक मोहीम’ राबविण्यात येईल. दिनांक २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यामध्ये “सर्वांसाठी घरे’ या उपक्रमासाठी पूरक उपक्रम राबविले जातील. तर, २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या अंतिम टप्प्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक परिस्थितीचा विचार करुन “नावीन्यपूर्वक उपक्रम’ राबविले जातील.







