देवेंद्र फडणवीसांनीच मुख्यमंत्री राहावे; अनावश्यक राजकीय चर्चांना पूर्णविराम द्यावा- प्रफुल पटेल

गोंदिया निवासस्थानी राज्य व राष्ट्रीय राजकारणातील विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका; जम्मू-काश्मीरपासून मराठी भाषेपर्यंत अनेक विषयांवर परखड मतप्रदर्शन

दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया:- राजकारणाच्या पटावर सध्या रंगलेल्या तर्क-वितर्कांना उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला फारसे महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले. रविवारी गोंदियातील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय राजकारणातील विविध घडामोडींवर भूमिका मांडताना संयमित, परंतु स्पष्ट शब्दांत मत व्यक्त केले.

‘फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास’
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बदलाबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना पटेल म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आहेत. शेतकरी, गोरगरीब, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. त्यामुळे त्यांनीच मुख्यमंत्री राहावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.’ मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सूचित केले.

जम्मू-काश्मीरबाबत अफवांना फाटा
जम्मू-काश्मीरमधील सरकार पाडण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना पटेल यांनी अशा दाव्यांना स्पष्ट शब्दांत नाकारले. नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने लोकशाही मार्गाने सरकार स्थापन झाले आहे. एखाद्या पक्षातील अंतर्गत मतभेद किंवा आमदारांच्या हालचालींसाठी प्रत्येकवेळी भाजपाला जबाबदार धरणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

राम मंदिर प्रकरणात संयमाची भूमिका
राम मंदिरातील कथित चोरीच्या घटनेबाबत बोलताना त्यांनी संतुलित भूमिका घेतली. ‘घडलेला प्रकार निश्चितच चुकीचा आहे; मात्र एका मंदिरातील घटनेवरून सर्व मंदिरांबाबत संशय निर्माण करणे किंवा व्यापक निष्कर्ष काढणे योग्य नाही,’ असे ते म्हणाले. श्रद्धा आणि वास्तव यांचा समतोल राखण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.

एकनाथ खडसेंना खोचक टोला
एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपमध्ये येण्यासाठी संपर्क साधल्याचा दावा केल्याबाबत विचारले असता, पटेल यांनी मिश्रीत शब्दांत प्रतिक्रिया दिली. ‘खडसे यांनी आधी आपण नेमके कोणत्या राजकीय भूमिकेत आहोत, हे ठरवावे,’ असा टोला त्यांनी लगावला.

मराठीचा सन्मान हवा, सक्ती नव्हे
अंधेरी रेल्वे स्थानकावरील मराठी भाषेच्या वादावर प्रतिक्रिया देताना पटेल म्हणाले, ‘महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषेचा आदर करून ती बोललीच पाहिजे. मात्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची भरती अखिल भारतीय स्तरावर असल्याने त्यांच्यावर मराठीची सक्ती करणे व्यवहार्य ठरणार नाही.’

पत्रकार परिषदेत व्यक्त झालेल्या पटेल यांच्या भूमिकेत राजकीय संयम, लोकशाहीवरील विश्वास आणि व्यवहार्यतेचा सूर ठळकपणे उमटला. विविध संवेदनशील विषयांवर त्यांनी प्रतिक्रिया देताना वादाला खतपाणी न घालता समतोल दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *