दिव्यांगांचे गणराज्यदिनी ‘करो वा मरो’ आंदोलन;२६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

भंडारा: दिव्यांगांच्या विविध मागण्या दुर्लक्षित असून, याला शासनाचे उदासीन धोरण कारणीभूत आहे. न्याय मागण्यांचा पाठपुरावा करून सुद्धा दिव्यांगांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. त्यामुळे अपेक्षित मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय गणराज्य दिनी २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करो वा मरो आंदोलन होणार आहे.

प्रहार अपंग क्रांती आंदोलन भंडारा चे जिल्हाध्यक्ष रवि मने तसेच पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून हा इशारा दिला आहे. दिव्यांगांनी २६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रवि मने, जिल्हासचीव योगेश्वर घाटबांधे, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रशांत शिवणकर, एकनाथ बाभरे, विद्या कुकडे, सीमा कोसरे, पिंटू पटले,तालुकाध्यक्ष सुनिल कहालकर, चरणदास सोनवणे, लिना साखरे, शेषराव गणवीर केले आहे.

या आहेत मागण्या

दिव्यांग बांधवांना ६ हजार रुपये पेन्शन तातडीने लागू करावी मानधन दिव्यांग लाभार्थ्याच्या बँक खात्यात खूप उशिरा जमा होते ते तातडीने व नियमित वेळेत देण्यात यावे उत्पन्नाची अट एक लाख पन्नास हजार करण्यात यावी मुले एकवीस वर्षे झाल्यावर पेन्शन बंद करण्यात येऊ नये, प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज दिव्यांग भवनाची उभारणी करावी, अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा, व्यवसायासाठी २०० चौ.फु. जागा द्यावी, वित्त विकास महामंडळाकडून वितरित केलेले कर्ज माफ करावे, याआधी दिलेली फिरत्या विक्री केंद्राची वाहने निकृष्ट असल्याने चांगल्या कंपनीची वाहने उपलब्ध करावीत, दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करावी, स्वयंरोजगाराकरिता स्टॉल द्यावे, राज्यात दिव्यांग विद्यापीठ तयार करावे, दिव्यांगांना अंतोदय योजनेत समाविष्ट करावे, आदी मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे.

सरकारने लक्ष द्यावे

विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी बार्टीच्या धर्तीवर संत गाडगेबाबा दिव्यांग प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात यावे, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *