“ऑपरेशन सिंदूर’ सैनिकांच्या सन्मानार्थ भंडारा शहरात निघाली ५५५ फुट तिरंगा रॅली
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “आपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून भारताने दहशतवादाच्या विरोधात नवीन लक्ष्मणरेषा रेखाटली आहे. या ऑपरेशनमधून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताचे सामर्थ्य जगाला दिसून आले. भारतमातेच्या वीरपुत्रांनी गाजवलेले शौर्य ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या ऑपरेशनमधील विजयानंतर भारतीय तीनही दलातील वीरांना सलाम करण्यासाठी भंडारा शहरात आज रविवारला सायंकाळी ५५५ फुट असलेल्या तिरंगा ध्वजाची “तिरंगा रॅली’ काढण्यात आली.
या रॅलीत सर्वपक्षीय नेते, आजी व माजी सैनिक, मुली व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीत मुस्लिम बांधव सुद्धा उपस्थित होते. ही रॅली जलाराम मंगल कार्यालय-गांधी चौकसंविधान चौक-मुस्लिम लायब्ररी चौक- अण्णाभाऊ साठे चौकातून काढून गांधी चौकात समारोप करण्यात आला.या वेळी तीनही भारतीय सैन्य दलातील जवानांचे कौतुक करत त्यांची जयजयकार करून “भारत माता की जय’ यासह उद्घोषणा देत जल्लोष करण्यात आले. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुध्दा अभिनंदन करण्यात आले. ५५५ फुट असलेला तिरंगा ध्वज आजी व माजी सैनिक, महिला तसेच नागरीकांनी पकडला होता. समोर भारत माता ची फोटो होती. शहरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.