शासनाचे नियम झुगारुन तीव्र उन्हाळ्यात शाळा भरविणाऱ्यावर गुन्हे दाखल करा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- विदर्भात जून महिन्यात कडक उन्हाळा असतो. यासाठी विदर्भात २६ जून पासून शाळा भरविण्यात यावा असा नियम आहे. परंतु सर्व नियमांना नेहमीप्रमाणे बगल देत भंडारा जिल्ह्यातील अनेक सी.बी.एस.ई. शाळांनी भर उन्हाळ्यात वर्ग भरविले. यामुळे विद्यार्थी बिमार पडू शकतात. अश्या शाळांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. यासाठी जागरूक पालकां तर्फे एक निवेदन शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर व जिल्हा शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांना देण्यात आलेत. भंडारा जिल्ह्यात उन्हाळ्यात तापमान ४५ डिग्री असतो.शालेय विद्यार्थ्यांसाठी एवढ्या उन्हात शाळेत बसणे अत्यंत हानिकारक आहे. अनेक शाळांमध्ये वातानुकूलित यंत्रणेचा अभाव आहे. काहीं ठिकाणी तर वर्ग खोल्यांमध्ये साधे पंखे सुद्धा नाहीत. पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव आहे. अश्या परिस्थितीत चिमुकले विद्यार्थी उष्माघाताचे बळी ठरू शकतात. परंतु निव्वळ आर्थिक नफ्यासाठी भर उन्हात शाळा भरवून सीबीएसई शाळा संचालक शासनाच्या दिशा निर्देशांचा सर्रास उल्लंघन करतात.
विदर्भात उन्हाळ्यात उष्णतेची अधिक तीव्रता असल्याने शाळा २६ जून रोजी सुरू होतात तर, उर्वरित महाराष्ट्रातील शाळा ज्या ठिकाणी उष्णता कमी आहे त्या शाळा १५ जून रोजी सुरूकरण्याचा नियम आहे. भर उन्हात शाळा सुरू करणे अत्यंत घातक आहे. विद्यार्थी उष्माघाताने दगावू शकतो. त्यामुळे अश्या शाळांवर त्वरित गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदन देते वेळी नागपूर विद्यापीठाचे पूर्व सिनेट सदस्य प्रविण उदापुरे, बालू ठवकर, शिक्षा बचाव आंदोलन समितीचे जिल्हा संयोजक नितीन निनावे, सतीश सार्वे, विद्यार्थिनी नेते हिमांशू मेंढे, मृणाल गोस्वामी, हेमंत बडवाईक, किशोर आगलावे, प्रभाकर सार्वे, श्रीकांत बनसोड, प्रफुल शेंडे, मनोज लुटे, अमित मेश्राम, आशिष वाघमारे इत्यादी पालक उपस्थित होते.