नाशिकसाठी भाजपचा आग्रह तर शिवसेनाही सोडायला तयार नाही; पालकमंत्रीपदामागचं राजकारण नेमकं काय?
पुणे:- पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील चांगलंच नाराजी समोर येताना दिसतं आहे. रायगड आणि नाशिकवरुन महायुतीत मतभेद दिसत आहेत. दोन्ही ठिकाणी वाद होत असतांना भेटीगाठींचा सिलसिला देखील वाढला आहे. मात्र, दोन्ही जिल्हे शिवसेनेसाठी इतके महत्त्वाचे का आहेत? आणि नेमकं भाजपवर इतका दबाव का टाकला जातोय? पाहूया याच संदर्भात एक रिपोर्ट. पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर लगेच २४ तासांच्या आत रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पद रद्द करण्यात आलं. शिवसेना आणि भाजपमध्ये दोन्ही जिल्ह्यांवरुन महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेकडून रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पद मिळावं यासाठी आग्रही मागणी होताना दिसत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रायगडमधील शिवसेनेचे नाराज आमदार भेट घेणार आहेत. भरत गोगावले यांनाचपालकमंत्री करा, अशी आग्रही मागणी समोर येताना दिसत आहे. अशातच, भाजप आणि राष्ट्रवादी मात्र यात कोंडीत सापडल्याचे चित्र आहे.
भाजपकडून देखील नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत आग्रही मागणी समोर येताना दिसत आहे. येणाèया स्थानिक स्वराज्य संस्था आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाजपसाठी नाशिकचं पालकमंत्री पद महत्त्वाचं असल्याने भाजप देखील अडून असल्याची सूत्रांची माहिती आहे. याप्रकरणी, गिरीश महाजन यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चां देखील केल्याची माहिती आहे. सोबतच, राष्ट्रवादीसाठी रायगड जिल्हा देखील महत्त्वाचा असल्याने तोन देण्याची आग्रही मागणी एनसीपीची आहे. दरम्यान, तिकडे पालकमंत्री पदाच्या वादावरुन विरोधकांकडून महायुतीवर चांगलंच तोंडसुख घेतलं जातं आहे. पालकमंत्रीपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेला संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहेत