आमगावात बारावी ची परिक्षा तणावातून विद्यार्थ्याची अनुत्तीर्ण झाल्यामुळे मानसिक गळफास लावून आत्महत्या
मुलाच्या या अचानक निर्णयामुळे शिवणकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कुटुंबियांकडून घटनेची माहिती आमगाव पोलिसांना देण्यात आली. आमगाव पोलिसानी घटनास्थळ गाठून गळफास अवस्थेतील मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठवण्यात आले आहे. सदर घटनेचा पंचनामा करून पुढील तपास आमगाव पोलिसा कडून सुरू आहे. सोमवार ५ मे २०२५ रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला.
गोंदिया जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.०४ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी गोंदिया जिल्ह्याचा निकालाची ९५.२४ टक्के होती. या वर्षी त्यात १ टक्क्यांनी घट झाली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील एकूण १७९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी १७९०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी एकूण १६८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गोंदिया जिल्ह्यातील एकूण १०६७ विद्यार्थी या बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले होते त्यापैकीच एक आमगावचा कृष्णा धरम शिवनकर (१८) हा होता. बारावीचा अपेक्षित निकाल न लागल्यामुळे कृष्णा हा सोमवार ५ मे निकालाच्या दिवसा पासूनच मानसिक तणावात होता. कृष्णा ने बारावीच्या परीक्षेतील अपयश आल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती आमगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांनी दिली. तो निकालानंतर मानसिक तणावात असल्याचे त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले, अशी माहिती ही पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांनी लोकजन सोबत बोलताना दिली.
या घटनेने आमगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. परीक्षेचे मानसिक ओझे किती जीवघेणे ठरू शकते, याचे हे अत्यंत वेदनादायक उदाहरण असल्याची प्रतिक्रिया सामाजिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण समाजासाठी सावधानतेचा इशारा आहे. परीक्षांचा निकाल हा आयुष्याचा शेवट नाही, ही जाणीव पालक, शिक्षक आणि समाजाने विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवणे अत्यावश्यक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.