“नवतपा’ ठरणार का तापदायक?

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : – नवतपाला २५ मे पासून सुरुवात झाली. नवतपा म्हणजे सूर्याचे रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यावरच्या पहिल्या नऊ दिवसांचा कालावधी. ज्यामध्ये उष्णता सर्वाधिक असते. हा नवतपा ९ दिवस असणार असून २ जून रोजी संपेल. यावर्षीचा नवतपा तापदायक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वर्षभरातील सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस म्हणून ‘नवतपा’ ओळखला जात असून, नवतपा म्हणताच अंगाला घाम फुटतो. रविवारपासून (दि. २५) नवतपाला सुरुवात होत झाली. पहिल्या दिवशी नवतपाचा असर दिसला नाही. उर्वरीत आठ दिवस किती तापणार, याचा विचार करूनच धडकी भरत आहे. विशेष म्हणजे, अचानक वातावरण बदलत असल्याने नवतपात उन्हाची दाहकता अंगाला भाजून सोडते की पावसाच्या सरी भिजवून टाकतात, हे बघायचे आहे. उन्हाळा म्हटला की घामाच्या धारा लागत असून, धडकीच भरते. कडक उन्हात घराबाहेर पडणे जीवघेणेच ठरत असून, कष्टकरी लोकांना मात्र कामासाठी बाहेर पडावेच लागते.

म्हणून उन्हाळ्याचे चार महिने लवकरात लवकर संपावेत, अशी कामना सर्व करतात. त्यातही मे महिन्यातील उन्ह म्हणजे अंगाला भाजून सोडणारे असते. घराबाहेर पडताच अंगाची लाहीलाही करणारे ऊन पडत असल्याने कधी-कधी आपले घर गाठावे, अशीच सगळ्यांची इच्छा असते. मे महिन्यात सर्वाधिक ऊन तापत असून, या महिन्याच्या शेवटीच नवतपा लागतो. नवतपा म्हणजे नऊ दिवसांचा काळ असून, या नऊ दिवसांत उन्हाळ्यातील सर्वाधिक ऊन तापते, असे म्हटले जाते. म्हणजेच,उन्हाळ्याच्या चार महिन्यांतील उन्हाची कसर या नऊ दिवसांत भरून निघते, असे म्हटले जाते. म्हणूनच नवतपा म्हणताच अंगाला घाम फुटू लागतो. मे महिन्याचा शेवट व जून महिन्यातील दोन दिवस हा नवतपा घेणार आहे. मात्र, यंदा मे महिन्याने एकीकडे जेथे चांगलेच तापवले आहे, तेथेच अधामधात ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस असल्याने यंदाचा नवतपा पावसात निघून जावा, अशी सर्वांची देवाकडे मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *