मागून मिळणार नाही, सरकारशी संघर्ष करायला तयार रहा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- तुमची लढाई सोपी नाही. शांत बसून वाट बघता येणार नाही. मागून काही मिळणार नाही. हक्कासाठी आवाज ठेवला नाही तर सरकार काहीही देणार नाही. हक्कासाठी मैदानात लढायला उतरावे लागेल असे प्रतिपादन आयटकचे नेते माधवराव बांते यांनी केले. तुमसर येथील पंचायत समितीच्या विवेकानंद सभागृहात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षीय भाषण करताना कर्मचाऱ्यांना आवाहन केले. मेळाव्याचे उद्घाटन आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावरग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर, जिल्हा कार्याध्यक्ष शिवकुमार गणवीर, आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके, ग्रामपंचायत संघटनेचे कोषाध्यक्ष गजानन लाडसे, मोहाडी पंचायत समितीचे सभापती जगदीश शेंडे, माजी सभापती रितेश वासनिक, तुमसर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राजू कारेमोरे यांनी, राज्य शासनाच्या अधिकार क्षेत्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. व्यासपीठावर उपस्थित नेत्यांनी सुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विषयांवर मत व्यक्त केले. मेळाव्यात यावलकर समितीच्या शिफारशी लागू करा, किमान वेतन पुनर्गठीत करा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनावर शासनाने शंभर टक्के अनुदान द्यावे आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. मेळाव्याचे संचालन जयप्रकाश मेहर यांनी केले. उपस्थितांचे आभार जयशंकर राऊत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *