फडणवीस-शिंदेंचे ग्रह प्रबळ, उद्धव ठाकरेंचं संमिश्र ग्रहमान, ज्योतिषाचार्य पांडव गुरुजींच्या मते राज्यात कोणाची सत्ता येणार?

छत्रपती संभाजीनगर:राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणुकीपूर्वीं राज्यातील प्रमुख पक्षांनी अंतर्गत सर्वेक्षणांच्या माध्यमातून जनमताचा आढावा घेतला होता. मात्र, तरीही प्रत्यक्ष निवडणुकीत काय होणार, याबाबत सर्वच राजकीय पक्षांची धाकधूक निकालापर्यंत कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत महत्त्वाचे भाकीत वर्तविले आहे. त्यांनी सध्या कोणत्या नेत्यांचे ग्रहमान चांगले आहे आणि कोणासाठी चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे, याबाबतही भाष्य केले आहे. वेदमूर्तीं ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी हे सध्या निवडणुकीचा काळ असल्यामुळे प्रचंड व्यग्र आहेत. निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय नेते कुंडली शुद्ध करुन घेतात. त्यासाठी बगलामुखी, सुदर्शन याग, शतचंडी हे यज्ञ आणि बटुक भैरव यासारखी अनुष्ठानं करण्याकडे नेत्यांचा कल आहे. इच्छाशक्ती, स्वबळ आणि आकर्षण वाढवण्यासाठी हे अनुष्ठान केले जाते. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याचा शुभमुहूर्त शोधण्यासाठीही राजकीय नेते ज्योतिषांकडे जात आहेत. ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांच्याकुंडलीचाही अभ्यास केला आहे. यावरुन त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी काही भाकितं वर्तविली आहेत.