अवकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेले धान पीक केले भुईसपाट

दै.लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर मोहाडी विधानसभेतील गावांमध्ये सतत दोन दिवस वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला धान भुईसपाट झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी रायुका जिल्हा अध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी केली आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यातील ग्रामीण शेतकऱ्यांनी मोटारपंपाच्या भरोशावर धानाची लागवड केली होती. पुढील दहा पंधरा दिवसांनी धान कापणी ला येणार होते. धान विकून यंदा दिवाळी चांगली साजरी करु अशी आशा शेतकऱ्यांनी बाळगली होती. परंतु अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. परंतु दि. ३ व ४ तारखेला सलग दोन दिवस पाऊस आल्याने कापणीला आलेल्या धानाचे प्रचंड नुकसान होऊन धानपिक पूर्णपणे खाली कोसळले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जात असून बळीराजाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचा कृषी विभागाने तत्काळ पंचनामा करून तसेच विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे विमा कंपनीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी ही मागणी रायुका जिल्हा अध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी केली आहे.