ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनो, १ जुलैच्या मुंबई मोर्चात सहभागी व्हा

दै.लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- शासनाच्या विविध व जनकल्याणकारी योजना राबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ग्रामपंचायत कर्मचारी आज दारिद्रय नारायणाचा अवतार म्हणून जगत आहेत. ग्रामपंचायत कामगारांनो,आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कामगारांनी १ जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावरुन निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना (संलग्न भारतीय कामगार सेना) ५८२५ चे जिल्हा कार्याध्यक्ष रामलाल बिसेन सिहोरा यांनी १५ जून रोजी चांदपूर देवस्थान येथे झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बैठकीतून केले आहे. सदर मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावरून विधानसभेवर धडक देणार आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदान लागू करणे, कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निधी संघटना (ई.पी.एफ.) या कार्यालयात जमा करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करणे व वेतनासाठी लादलेली वसुलीची अट रद्द करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आकृतीबंधात सुधारणा करणे, जिल्हा परिषद सेवेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून एकूण रिक्त पदाच्या १० टक्के प्रमाणे वर्ग ३ व वर्ग ४ चे पदावर नियुक्ती देणे तशेच माहे ऑगस्ट २०२० ते मार्च २०२२ चे थकबाकी वेतन तात्काळ अदा करणे.

सदर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्याध्यक्ष विलास कुमरवार, सरचिटणीस दयानंद एरंडे व कार्याध्यक्ष जनार्दन मुळे यांनी या आंदोलनाची हाक दिली असून या मोर्चाचे नेतृत्व आ. सचिन अहिर तथा सरचिटणीस भारतीय कामगार सेना यांचे नेतृत्वात राज्यातील ग्रामपंचायत कामगाराच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाला सल्लागार बाबा कदम हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तरी भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने १ जुलैच्या मुंबई मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रामलाल बिसेन, जिल्हाध्यक्ष मारोती चेटुले, हेमराज वाघाळे, राजेश दिवटे, शैलेश चंद्रिकापुरे, मानिक लांबट, जयप्रकाश डोमळे, संतोष पंचबुद्धे, मुरलीधर उरकुडे, संदीप बनकर, शेरू चामट, रामू कानतोडे, विलास घोडीचोर, रोशन मरसकोल्हे, ज्ञानेश्वर मेश्राम, कवळू ठलाल, अरुण कुर्जेकर, शेखर राहांगडाले, सचिन आखरे, ओमराज डोंगरवार, राजेंद्र मेश्राम, कैलास नाणे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.